वाई:-गुणवंतांचा गौरव, समाजएकतेचा जागर! भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवात स्वकुळ साळी समाजाचा दिमाखदार सोहळा.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-गुणवंतांचा गौरव, समाजएकतेचा जागर! भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवात स्वकुळ साळी समाजाचा दिमाखदार सोहळा.

सातारा | वाई, दि. २६ : भक्ती, सामाजिक एकजूट आणि गुणवंतांच्या कौतुकाचा त्रिवेणी संगम घडवत स्वकुळ साळी समाज, वाई यांच्या वतीने आयोजित भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला. जन्मोत्सवानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, टीईटी परीक्षेत यश संपादन करणारे समाजबांधव तसेच सातारा जिल्हा कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक ठोके, स्वकुळ साळी समाज संघटना, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष महेश पागडे, कार्याध्यक्ष सुरेश पंढरपट्टे, सचिव उमेश घटे, संचालक योगेश कुचेकर, श्रीकांत डिंगणे आणि छत्रपती डांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा शुभारंभ झाला. स्वागत, प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या सत्कारानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा कार्यकारिणीवर निवड झालेले दत्तात्रय मर्ढेकर (सुकानू समिती सदस्य ), योगेश दाहोत्रे(संचालक ),आनंदा सुकाळे(संचालक ), मयूर कोदे(संचालक ), डॉ. शैलेश धेडे(संचालक ), सारिका गवते(प्रसिद्धी प्रमुख जिल्हा कार्यकारिणी ), सोनाली दाहोत्रे(संपर्क अधिकारी जिल्हा कार्यकारिणी ), सोनाली कोदेvadh, वनिता हावरे आणि इर्षा तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाच्या संघटनात्मक वाटचालीत नवी जबाबदारी स्वीकारणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी उत्स्फूर्त अभिनंदन केले.
शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी आणि टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्या साळी यांचा ही यावेळी गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच शिक्षणाला समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन बनविण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
प्रमुख अतिथी विवेक ठोके यांनी मार्गदर्शन करताना समाजातील तरुण पिढीने शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात महेश पागडे यांनी समाजातील विवाहसंस्थेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करत, योग्य वयात म्हणजेच २२ वर्षांच्या आत स्वकुळ साळी समाजातील मुलाशी विवाह करणाऱ्या मुलींना प्रोत्साहन म्हणून ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. अशा ५० विवाहांना हे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या घोषणेमुळे समाजातील तरुण पिढी, विवाहसंस्था आणि सामाजिक संघटन याबाबत चर्चेला नवा आयाम मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा अरबूणे यांनी केले. रवींद्र लटींगे यांनी प्रास्ताविक व अहवालवाचन केले, तर विद्या साळी यांनी आभार मानले. अखेरीस भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या आरतीने जन्मोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
गुणवंतांचा सन्मान, नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव, शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजएकतेचा संदेश अशा विविध पैलूंनी रंगलेला हा जन्मोत्सव स्वकुळ साळी समाजाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.





