वाई:-“डोंगर पोखरले… अन् गाव गाडले?” वाई-जांभळीत भीषण भूस्खलन; ७ जनावरे ठार, २५ एकर भातशेती मातीखाली! “अनधिकृत उत्खननामुळेच संकट?” ग्रामस्थांचा संतप्त सवाल; दोषींवर कारवाईची मागणी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“डोंगर पोखरले… अन् गाव गाडले?”
वाई-जांभळीत भीषण भूस्खलन; ७ जनावरे ठार, २५ एकर भातशेती मातीखाली!
“अनधिकृत उत्खननामुळेच संकट?” ग्रामस्थांचा संतप्त सवाल; दोषींवर कारवाईची मागणी.

सातारा | वाई | प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कहर केला असून जांभळी-पारटवाडी परिसरात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत ७ पाळीव जनावरांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ एकर भातशेती मातीखाली गाडली गेली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत, मुंबई-पुण्यातील काही धनदांडग्यांनी केलेल्या कथित अनधिकृत उत्खननामुळे डोंगराची नैसर्गिक रचना कमकुवत झाली आणि त्यामुळेच हे भूस्खलन घडले असावे, असा दावा केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, “नफ्यासाठी डोंगर पोखरले… पण भरडला गेला गरीब शेतकरी!” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तर उपअभियंता महेश गोंजारी यांच्या नेतृत्वाखाली जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने ओढ्यातील गाळ, दगड आणि झाडे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पुढील संभाव्य धोका टळल्याचे प्रशासनाने सांगितले.
भूस्खलनामुळे पुलाचा भराव वाहून गेल्याने वासोळे, आकोशी, जोर, धनगरवाडा आणि कोळीवस्ती या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी, नाले आणि पूल ओलांडताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
🔴 जनतेच्या मनातील सवाल…
➡️ जर अनधिकृत उत्खनन झालेच असेल, तर त्याला जबाबदार कोण?
➡️ डोंगराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष कोणी केले?
➡️ बळीराजाच्या कोट्यवधींच्या नुकसानीची भरपाई कोण करणार?
➡️ दोषींवर गुन्हे दाखल होणार की प्रकरण दाबले जाणार?
➡️ नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित संकट? उत्तर कोण देणार?




