ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थीप्रिय बहुआयामी प्राध्यापक : डॉ. रघुनाथ आण्णा केंगार.

प्रतिनिधी :- संतोष बोगाळे :-99239 00840

कोणत्याही क्षेत्रातील सेवानिवृत्ती आनंद आणि विरह अशा संमिश्र स्वरूपाची असते. भूतकाळाचा एक मोठा पट अशा क्षणी निवृत्त होणार्‍याच्या डोळ्यांसमोर उभा ठाकतो. यातूनच आठवांच्या झडीसह आत्मचिंतनाचे अंकुर तरारून वर येऊ लागतात. अर्थात, ज्यांच्या ठायी नोकरीत असताना नेमून दिलेल्या कामाखेरीज काही वेगळं करण्याच्या उमेदी श्वासरुप होतात, अशा व्यक्ती समाजहितैशी म्हणून ओळखल्या जातात. त्यांची हीच ओळख भविष्यातल्या अनेक पिढ्यांचे भविष्य घडविण्यासाठी नक्कीच कामी येते. आज वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील जेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, ‘क्रांतिबा’ नियतकालिकाचे संपादक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ आण्णा केंगार दिनांक 30 जून 2022 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. म्हणूनच प्रस्तुतचा लेखन प्रपंच.
कराड परिसरातील, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवणारा आणि पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावणारा एक प्राध्यापक म्हणून डॉ. रघुनाथ केंगार सर यांची कराड परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. कार्यकर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व या बळावर प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक पदापर्यंत वाचन, चिंतनातून ज्ञानार्जन करत आणि लेखनीतून प्रबोधनाचे धडे देत आदरणीय डॉ. रघुनाथ केंगार सर यांनी अनेक यशोशिखरे पार केली आहेत. कॉलेजमध्ये आणि घरातही शिक्षण कार्यात रमणारा हा अवलिया प्राध्यापक मला पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून लाभले हे माझे भाग्यच समजतो. कोणत्याही प्रकारची मदत सरांना जेव्हा मागितली जाते तेव्हा ते हसत हसत मदत करतात. सूक्ष्म निरीक्षण व पुनरावलोकन ही सरांची खासियत. कोणतेही कठीण काम सहज, हसत खेळत लीलया पार पाडण्याची अंगीभूत कला त्यांच्या ठायी आहे. संयमी शांत प्रवृत्ती, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा, साधी राहणी, चिंतनशिलता, काळजीवाहू ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
खरेतर ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीतल्या माणसांची सेवा करता यावी हा त्यांचा उद्देश आहे. सतत कार्यमग्न राहणं हा सरांचा स्वभावच. ते जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा त्यांच्याकडे एक मोठी बॅग असते आणि अगदी हसत खेळत ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. शिक्षक म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक ते सहपर्यायाने राष्ट्रीय जबाबदारीचा स्त्रोत. हाच विचार त्यांनी आपल्या संपूर्ण अध्यापन काळात जपला. डॉ. केंगार सर यांच्या अध्यापन, अध्यापनेतर साधनेकडे पाहता त्यांची प्राध्यापक ते लोकशिक्षकही मुद्रा त्यांच्या सहवास परिघात येणार्‍या प्रत्येकाच्या मनात गडद होत जाते. सरांनी घेतलेले श्रम, पराकाष्ठा विद्यार्थी वर्गाच्या संस्मरणात राहणारे आहेत.
तीस-पस्तीस वर्षांपासून अध्ययनाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याशी रममाण झालेले आहेत. एकरूप झालेले आहेत. अत्यंत हळवा, संवेदनशील मनाचा हा एक आदर्श प्राध्यापक म्हणून सरांना भेटल्यावर सहजच लक्षात येतं. पहिल्यांदाच लक्ष वेधून घेते ती त्यांची गोड मधुर वाणी. दलित जाती समूहात जन्मल्यामुळे लहानपणी अत्यंत दुःख हाल-अपेष्टा सहन केलेले डॉ. केंगार सर अत्यंत मनमिळावू आणि सहनशील आहेत. जातिभेदांमुळे लहानपणीच वाट्याला आलेली अस्पृश्यता, सर्व प्रकारच्या वंचना, उपेक्षा सहन करूनही त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि तेवढाच बाणेदार बनलेला आहे. विविध प्रकारची दुःख त्यांनी लहानपणी पाहिलेली आहेत. स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज, क्रांतिगुरू लहुजी साळवे, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जाणीवपूर्वक त्यांनी प्राध्यापकाची नोकरी पत्करली आहे. त्यामुळे आपण भोगलेले दुःख निदान पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणुन डॉ. केंगार सर हे सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या हातून आतापर्यंत अनेक मुले घडलेली आहेत.
डॉ. रघुनाथ केंगार सर यांचे माणदेशातील माण तालुक्यातील नरवणे हे मूळ गाव. त्यांचा जन्म आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे आजोळी झाला. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांच्या आई वडिलांनी शिक्षण दिले. आपल्या गरिबीची जाणीव ठेवून सरांनी उच्च शिक्षण घेतले आणि ते अध्यापनाकडे वळले. डॉ. रघुनाथ केंगार सरांनी विविध नियतकालिकातून दलित व वैचारिक लेखन केले आहे. वृत्तपत्रीय साहित्य पुरवण्यांपासून निखळ वाङ्मयीन मासिकं, दिवाळी अंकात त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. आकाशवाणीसारख्या व्यासपीठावरूनही सरांनी आपले विचार प्रगट केले आहेत. साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व माणदेशात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ उभी राहावी म्हणून माणदेश ज्ञानपीठ स्थापन केले.

दहिवडी येथे त्यांनी पहिले राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन व पुसेसावळी येथे राज्यव्यापी भेदिक शाहिरी परिषद भरवून यशस्वी केले. सरांनी साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत काम करताना अठरापगड जातीतील प्राध्यापक, तरुण हितचिंतकांना एकत्र करून दलित महासंघाची स्थापना केली. अनेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला. डॉ. केंगार सरांनी प्रतिकूलता असतानाही प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ता, संशोधक, साहित्यिक, व्याख्याते, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, संपादक, विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून काम करताना अनेक क्षेत्रातील लाखमोलाची माणसे जोडली.
डॉ. रघुनाथ केंगार सर वेणूताईचव्हाण कॉलेज , कराड येथे अध्यापन कार्य करत असताना श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) यांचे लाखमोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष म्हणून सरांनी जबाबदारी स्वीकारून 3 वर्षे कामकाज पाहिले.
डॉ. रघुनाथ केंगार हे होलार समाजातील पहिले पीएच.डी. प्राप्त करणारे विद्यार्थी आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांना डॉ. बाबासाहेब आबेडकर फेलोशीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर मुंबईचा बंधुत्व पुरस्कार, कराडचा शाहीर हैबती पुरस्कार, लातूरचा समाजरत्न पुरस्कार, पुणेचा आदर्श समाजभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या तासगाव येथील दहाव्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद ही सरांनी भूषविले आहे.
शिक्षक हा सर्वश्रुत असावा, असं म्हणतात. त्या अर्थाने प्रा. केंगार हे उत्तम वाचक, सहिष्णू श्रोता आणि परखड वक्ता आहेत. आपल्या या गुणांचा त्यांच्या दैनंदिन अध्यापनात प्रभाव पडला नसता, तर ते नवल ठरले असते. पदवी व पदव्युत्तर कला अध्यापन करताना त्यांना लाभलेली दिव्य सृजनशक्ती यांची सुंदर वीण त्यांनी आपल्या आजवरच्या आयुष्य वाटचालीत साधली आहे. या निवृत्तीच्या क्षणी या सार्‍या आठवांची आळवणी त्यांच्या अंतरी होणे स्वाभाविक आहे. डॉ. रघुनाथ केंगार सरांनी आयुष्यभर विद्यार्थी हेच दैवत मानून अध्ययन आणि अध्यापन केले आहे. प्रदीर्घ सेवेनंतर गुरुवारी (ता. 30) सेवानिवृत्त होत आहेत. सरांना वाचन, लेखनाचा छंद आहे. ते कविता करतात. लेख लिहितात. त्यांना शैक्षणिक साहित्याची आवड आहे. यापुढेही त्यांनी आपले हे छंद जोपासावेत.
अशा या विद्यार्थीप्रिय बहुआयामी प्राध्यापक आदरणीय गुरुवर्य डॉ. रघुनाथ केंगार सरांना सेवानिवृत्तीक्षणी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या भविष्यकाळासाठी व सर्वोत्तम सृजनसेवेसाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुरोग्य देवो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button