कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह? पाहणीत उघडकीस आली अपूर्ण कामांची वस्तुस्थिती!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड उड्डाणपुलाच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह? पाहणीत उघडकीस आली अपूर्ण कामांची वस्तुस्थिती!

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाची खासदार, आमदार आणि अन्य मान्यवरांनी अचानक पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उड्डाणपूल नेमका कधी सुरू होणार याकडे कराडकरांचे लक्ष लागले असताना प्रत्यक्ष पाहणीत अद्याप अनेक महत्त्वाची कामे शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहणीवेळी उदयनराजे भोसले, अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाची सद्यस्थिती, उर्वरित कामे आणि पूर्णत्वाबाबत सविस्तर माहिती घेतली.
पाहणीत उड्डाणपुलावरील काही तांत्रिक कामे, सेवा रस्त्यांची उभारणी, सुरक्षाविषयक उपाययोजना आणि इतर पूरक कामे अद्याप सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीला कामात गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, उड्डाणपूल २० जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नियोजित तारखेला उद्घाटन होईल का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. अनेक कराडकरांनी “घाईघाईत उद्घाटन नको, दर्जेदार आणि सुरक्षित काम हवे” अशी भूमिका व्यक्त केली आहे.
कामादरम्यान अनेक ठिकाणी खोदकाम, बांधकाम साहित्याचे ढीग आणि अपूर्ण भाग अद्यापही दिसून येत आहेत. काही ठिकाणी पुरेशी बॅरिकेड्स, इशारा फलक आणि सुरक्षाव्यवस्था नसल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कराडच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ठरणाऱ्या या उड्डाणपुलाकडून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. मात्र, केवळ जाहीर केलेली तारीख गाठण्यासाठी उद्घाटन करण्याऐवजी सर्व कामे पूर्ण करून आवश्यक तांत्रिक तपासण्या व सुरक्षा चाचण्या झाल्यानंतरच उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी ठाम भावना कराडकर व्यक्त करत आहेत. सुरक्षितता, गुणवत्ता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांनाच प्राधान्य दिल्यास हा बहुप्रतिक्षित प्रकल्प शहरासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल.
2) कराड बसस्थानकाची दुर्दशा; पाणी नाही, स्वच्छता नाही, प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत!

कराड | प्रतिनिधी
कराड येथील मध्यवर्ती बसस्थानकात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव निर्माण झाल्याने हजारो प्रवाशांना दररोज प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूरसह विविध भागांतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या या बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक दिवस साफसफाई न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याअभावी परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याच्या प्रवासातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याशिवाय काही समाजकंटकांकडून स्वच्छतागृहातील भिंती व साहित्याची मोडतोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक सुविधा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
कराड हे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असतानाही बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. वॉटर कुलर बंद आहेत की प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकातील अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन स्वच्छतागृहांची दुरुस्ती, नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन जागे होणार कधी?” हा प्रश्न आता कराडकरांकडून थेट विचारला जात आहे.
3) मसूर बस स्थानक परिसरात २०० मीटर ‘नो-पार्किंग’ झोनची कडक अंमलबजावणी!

अवैध प्रवासी वाहतुकीला चाप; एस.टी. प्रशासनाची धडक मोहीम.
मसूर दि. ०८ : मसूर बस स्थानक आणि परिसरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एस.टी. प्रशासनाने कंबर कसली आहे. शासनाच्या नियमानुसार बस स्थानक परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत ‘नो-पार्किंग’ झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष पाहणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मसूर आगार व्यवस्थापक श्रीमती शर्मिष्ठा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. बस स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश श्रीमती पोळ यांनी दिले.
या विशेष मोहिमेदरम्यान एस.टी. महामंडळाचे नितीशकुमार पवार (वाहतूक निरीक्षक), आशुतोष चव्हाण (वाहतूक निरीक्षक – वाहतूक शाखा), श्रीमती श्वेता गायकवाड (राखण व पहारा निरीक्षक – सुरक्षा व दक्षता शाखा) तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण बस स्थानक परिसराची बारकाईने पाहणी केली. नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांना समज देण्यात आली, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन न देण्याचे आवाहन वाहनचालक व नागरिकांना केले.
दरम्यान, “मसूर बस स्थानक परिसरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था राखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अशी धडक मोहीम यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहे,” असे एस.टी. प्रशासन, मसूर आगार यांच्याकडून सांगण्यात आले.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे बस स्थानक परिसर मोकळा श्वास घेणार असून, प्रवाशांमधून या मोहिमेचे स्वागत होत आहे.




