वाई:-सत्ता स्थिर, विकास गतिमान! वाईत विजयी नेतृत्वाचा जल्लोष.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सत्ता स्थिर, विकास गतिमान! वाईत विजयी नेतृत्वाचा जल्लोष.

वाई नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये दणदणीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी (दि. २८ डिसेंबर २०२५) वाई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
वाई तालुका मराठी पत्रकार संघ, सर्वांगी प्रतिष्ठान व लोकमान्य टिळक स्मारक संस्था, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य परिषद, साताराचे अध्यक्ष मा. शिरीष चिटणीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व गुरुकुल प्रशाला, साताराचे संस्थापक श्री. राजेंद्र चोरगे उपस्थित होते. राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
अध्यक्षीय भाषणात शिरीष चिटणीस यांनी वाईच्या विकासासाठी दूरदृष्टीचा सूर लावत,
“वाईसारख्या ऐतिहासिक शहराने आता आधुनिकतेकडे झेप घ्यायला हवी. मोठ्या, महत्त्वाकांक्षी व दूरगामी प्रकल्पांची अंमलबजावणी नव्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी करावी,” असे स्पष्ट आवाहन केले.
प्रमुख पाहुणे राजेंद्र चोरगे यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना,
“पक्षभेद बाजूला ठेवून निपक्षपाती, पारदर्शक व जनहिताचा कारभार झाला पाहिजे. शहराचा विकास हाच एकमेव अजेंडा असावा,” असे ठाम मत व्यक्त केले.
कार्यक्रमात राजेंद्र ननावरे व दत्ता मर्ढेकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुस्पष्ट प्रस्ताविक राजेश भाऊ यांनी केले. मानपत्रांचे वाचन सौ. सोनाली भोजी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय तनुजा इनामदार, तर नगराध्यक्ष व नगरसेवकांचा परिचय अशोक येवले व विठ्ठल माने यांनी करून दिला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना जनतेने दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“वाईच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक एकत्रितपणे काम करू. शहराचा चेहरा बदलण्याचा आमचा निर्धार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी भारत खामकर, विश्वास पवार, आदित्य चौंडे, जागृती पोरे यांनीही आपली मनोगते मांडून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रंगता बेडेकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन भद्रश भाटे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वास सोनावले, अॅड. दीक्षित, शीतल नायकवडी, सारिका ननावरे, सारिका गवते, छाया सोनावणे, प्रकाश मांढरे, भारती मांढरे, सोनल ठक्कर, शिरीष जाधव, मीरा अडसूळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
वाईच्या राजकीय वाटचालीत नवा अध्याय ठरलेला हा सत्कार समारंभ शहराच्या विकासाला गती देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.




