सातारा:-कोरोना सर्व्हेचा बहाणा अन् दरोडा; पाच सराईतांना न्यायालयाचा दणका!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-कोरोना सर्व्हेचा बहाणा अन् दरोडा; पाच सराईतांना न्यायालयाचा दणका!

ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या टोळीला ३ वर्षे सक्तमजुरी; दंडासह नुकसानभरपाईचे आदेश.
सातारा | दि. ०९
कोरोना महामारीच्या काळात सर्व्हेच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून पिस्तूल आणि क्लोरोफॉर्मचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी पाचही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या एकूण रकमेतून १० हजार रुपये तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.
हा प्रकार २८ ऑगस्ट २०२० रोजी सातारा शहरातील रविवार पेठ येथे घडला होता. महेंद्र रामदास मारणे, सोमनाथ अंकुश सातव, युवराज उर्फ योगराज यशवंत शिंदे, रुपाली दत्तात्रय टेमगिरे आणि गोविंद रामदास मारणे यांनी कोरोना सर्व्हे करण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिक श्रीकांत विठोबा बिल्लमपल्ली (वय ६९) यांच्या घरात प्रवेश केला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी डॉक्टरांचे अॅप्रन परिधान केले होते, तर सोबत पिस्तूलसदृश एअरगन आणि क्लोरोफॉर्मची बाटलीही आणली होती.
सर्व्हेच्या नावाखाली माहिती घेत असतानाच आरोपींच्या इतर साथीदारांनी घरात प्रवेश केला. त्यांनी बिल्लमपल्ली यांना धक्का देऊन खाली पाडले, तोंड व गळा दाबून धरला आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीची २१.४२० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून फरार झाले.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब एस. कदम यांनी करून आरोपींना अटक केली आणि न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन मुके यांनी सात साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे आणि तपासातील महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
या खटल्यात सातारा शहर पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव, अमित भरते आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मोटे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, फसवणूक आणि दरोड्याच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
2) जावळी:-डोंगर दणाणला, पण प्रशासनाची तत्परता ठरली जीवदान!

सायघरमध्ये घरावर दरड कोसळली; ११ कुटुंबांतील ४५ जणांचे तातडीने सुरक्षित स्थलांतर.
सातारा | जावळी
जावळी तालुक्यातील सायघर येथे बुधवारी पहाटे मुसळधार पावसामुळे एका राहत्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने तातडीने कारवाई करत ११ कुटुंबांतील ४५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्यात आल्या.
स्थलांतरित कुटुंबांपैकी एका कुटुंबाची व्यवस्था गावातील शाळेत, तर उर्वरित दहा कुटुंबांनी नातेवाईकांकडे किंवा स्वतःच्या दुसऱ्या घरात तात्पुरता आसरा घेतला आहे.
सायघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, धोकादायक ठिकाणी राहणाऱ्यांनी विलंब न करता सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
3) मुंबई:-मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचा वेगवान पुढाकार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाच्या धोरणांवर मंथन!

मुंबई, दि. ९ : मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. उपसमितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, कल्याणकारी योजनांवर आणि भविष्यातील धोरणात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मराठा समाजातील युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या नव्या संधी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून त्यांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. मराठा समाजाचा सर्वांगीण विकास हेच उपसमितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले, आशिष शेलार, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे तसेच प्रसाद लाड यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मराठा समाजाच्या विकासासाठी सकारात्मक सूचना आणि ठोस भूमिका मांडल्या.
मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासन कोणते ठोस निर्णय घेते आणि त्यांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
4) कराड तालुका अलर्ट! तारळी नदीचा रौद्रावतार; पाल येथील पुलावर जीव धोक्यात घालू नका!

कराड तालुका अलर्ट! पाल येथे तारळी नदीला भीषण पूर; पुलावर गर्दी करू नका, प्रशासनाचे आवाहन
सातारा | कराड दि. ०९ : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कराड तालुक्यालाही बसला असून, पाल येथे तारळी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे तारळी नदी दुथडी भरून वाहत असून, पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
मात्र, पूरस्थिती गंभीर असतानाही पूर पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ-सेल्फी काढण्यासाठी पाल पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वेगवान प्रवाह आणि वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता ही गर्दी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट इशारा देत नदीकाठ, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, सेल्फी किंवा व्हिडिओच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
जीव मौल्यवान आहे… पूर पाहण्यासाठी नव्हे, सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घ्या!
5) कोरेगाव:-“आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, सोयाबीनला भरघोस उत्पन्नाची ग्वाही!”

कोरेगावात बी.बी.एफ. तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी मेळावा; एआय, ठिबक व सौरऊर्जेवर विशेष भर.
सातारा | कोरेगाव, दि. ०९ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव येथे बी.बी.एफ. (ब्रॉड बेस फरो) तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीन उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ठिबक सिंचन, सौरऊर्जा आणि बी.बी.एफ. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढविणे व खर्च कमी करणे यावर या मेळाव्यात विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनिल खत्री होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संग्राम पाटील, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, कृषी अधिकारी अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रगतशील शेतकरी तथा कृषीभूषण अनंत माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुनिल खत्री यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रूफटॉप सोलर, ठिबक सिंचन आणि ऑटोमेशन यांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि फायदेशीर होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संग्राम पाटील यांनी बी.बी.एफ. तंत्रज्ञानामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, तसेच योग्य व्यवस्थापन केल्यास ९० ते १२० दिवसांत प्रतिएकर सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता असल्याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी ऊस उत्पादनात एआयचा वापर तसेच डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर आणि ‘रेड जार्वी’ पेरू लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे यांनी जिल्ह्यातील सर्व सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात व्यवस्थापन अधिकारी सुरेश खरात यांनी मेळाव्याचा उद्देश आणि बँकेच्या विविध कृषी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास प्राथमिक सेवा सहकारी संस्थांचे lपदाधिकारी, प्रगतशील शेतकरी, सोलर कंपन्यांचे प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विक्री अधिकारी श्रीमंत कदम यांनी आभार मानले.
6) किंगमेकरांचा पुन्हा दबदबा! ‘कृष्णा’च्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले; व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे बिनविरोध.

कराड | दि. ०९
सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले, तर व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व २१ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक हॅट्रिक करणाऱ्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलने पुन्हा एकदा कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
कारखान्याच्या कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदासाठी डॉ. सुरेश भोसले आणि व्हाईस चेअरमनपदासाठी जे. डी. मोरे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदांनी सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, सभासदांना अधिकाधिक ऊसदर, आधुनिक सुविधा आणि ‘कृष्णा’ कारखान्याला राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला होता.
निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संचालक, अधिकारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
7) जावळी:-“म्हाते-मुरा गावावर भूस्खलनाचे सावट! जमिनीला भीषण भेगा; १६ कुटुंबांतील ६१ नागरिकांचे तातडीने स्थलांतर”

सातारा | जावळी दि. ०९ :
जावळी तालुक्यातील म्हाते-मुरा गावावर भूस्खलनाचे गंभीर संकट ओढवले असून, आज झालेल्या भूस्खलनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील माती सैल होऊन गावातील काही ठिकाणी जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. संभाव्य मोठा धोका ओळखत प्रशासनाने तत्परता दाखवत धोक्याच्या क्षेत्रातील १६ कुटुंबांतील ६१ नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
घटनेची माहिती मिळताच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुरक्षित ठेवण्यात आले असून, प्रशासनाकडून परिसरावर २४ तास नजर ठेवली जात आहे. परिस्थिती बिघडल्यास तातडीने आणखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने डोंगरकडील भागातील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जमिनीला भेगा पडणे, माती सरकणे किंवा अन्य संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तातडीने महसूल विभागाशी संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हाते-मुरा येथील घटनेमुळे जावळी तालुक्यातील भूस्खलनप्रवण गावांची चिंता पुन्हा वाढली असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी संवेदनशील भागांमध्ये अशाच घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.




