उदगीर:-पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारला धडा शिकवणार!—मुख्यमंत्र्यांकडे थेट पाठपुराव्याची शिवेंद्रराजेंची ग्वाही.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारला धडा शिकवणार!—मुख्यमंत्र्यांकडे थेट पाठपुराव्याची शिवेंद्रराजेंची ग्वाही.

प्रतिनिधी सारिका गवते
उदगीरमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन; पत्रकारांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा
उदगीर:
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून तोडगा काढू, अशी ठाम ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. उदगीर येथे पार पडलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेच्या या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा होणार असून, सर्व निवेदने स्वतःकडे घेऊन मुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिवेंद्रराजेंनी दिले.
यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील , ‘लोकमत ’ समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा , आमदार संजय बनसोडे , मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम . देशमुख , अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला, मात्र त्याची अंमलबजावणी अपेक्षित गतीने होत नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबतही लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुद्रित माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करताना, “वर्तमानपत्रांवरील लोकांचा विश्वास आजही कायम आहे,” असे सांगितले. तर राजेंद्र दर्डा यांनी पत्रकारितेत वेगापेक्षा सत्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी एस. एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुलभ करणे आणि अधिस्वीकृतीच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली. आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर येथे पत्रकार भवनासाठी निधी दिल्याची माहिती देत, जिल्हा निर्मितीसाठी पाठपुराव्याचे आश्वासन दिले.
अधिवेशनात हजारोंच्या संख्येने पत्रकार उपस्थित राहून विविध प्रश्नांवर आपली मते मांडली.
“हरीश पाटणे—मैत्री आणि प्रामाणिकपणाचा संगम” : शिवेंद्रराजे
या अधिवेशनात हरीश पाटणे यांचे विशेष कौतुक करताना शिवेंद्रराजे म्हणाले, “मैत्री जपतानाच त्यांनी पत्रकार म्हणून टीकाही केली आणि गरजेच्या वेळी साथही दिली—हीच खरी पत्रकारितेची ताकद आहे.”




