उंब्रज:-(सातारा)- तणावरहित शिक्षणासाठी ‘शिक्षक’ शालेय संस्कृतीचा अविभाज्य भाग – सौ.माधुरी सूर्यकांत शिंदे-जाधव.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
उंब्रज:-(सातारा)- तणावरहित शिक्षणासाठी ‘शिक्षक’ शालेय संस्कृतीचा अविभाज्य भाग – सौ.माधुरी सूर्यकांत शिंदे-जाधव.
‘शिक्षक’ शालेय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून अध्ययन प्रक्रियेत लक्षणीय व प्रभावी भूमिका साकारणारा महत्वपुर्ण घटक आहे. शिक्षकांनी निर्माण केलेल्या उत्तम शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, सक्रियता व अध्ययनाची आवड निर्माण होते.
भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांस गुरुचे स्थान आहे ते केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांचा आदर्श प्रेरणास्त्रोत म्हणजे शिक्षक होय. प्राचीन काळापासून आजतागायत शिक्षकाकडे समाज, आदर्शवत दृष्टीकोनातून पाहात आलेला आहे.. ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न, कर्तव्यनिष्ठ संयमी प्रामाणिकपणा सचोटी, ध्येय समर्पित वृत्ती अशा गुणांनी शिक्षकाची जडणघडण होत असते.
राष्ट्रीय शिक्षण आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार शिक्षक सबलीकरणाचे महत्व अधोरेखित केले आहे. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर बदलत जाणारी असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ती अधिक वेगाने बदलत आहे अध्ययन अध्यापन पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला आहे. त्याकरिता शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण ठरते.
आदर्श चारित्र्यसंपन्न माणूस निर्माण करणे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल व विवेक जागृत करून संस्कार करून सुसंस्कृत माणूस घडविण्याचे कार्य शिक्षक वृंद करतात. नेहमीच शिक्षण, विद्यार्थी विकास यांच्यामध्ये सर्जनात्मक विकासवृद्धीसाठी धडपडत असतात.
शिक्षण क्षेत्रात सेवा करत असताना शिक्षणातील पुढील प्रवासादरम्यान, ताणतणावाच्या अनेक प्रसंगाना शिक्षकाना सामोरे जावे लागत असते. प्रसंगानुरूप प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या ताण तणावातून जात असते. “कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे ताण.”
तणावात्मक परिस्थिती ही वैयक्तिक व शैक्षणिक जीवनात वेगवेगळे परिणाम निर्माण करते. शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या ताणामुळे कार्यक्षेत्रावर परिणाम होवू शकतो. विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ताणाचा सामना करावा लागतो.
शारीरिक कारणे, मानसिक आजार किंवा दुखापतीमुळे ताण निर्माण होतो असे नाही तर काही शुल्लक बाबी देखिल ताण निर्माण करतात उदा. गर्दी, ट्रॅफिक तणावात्मक परिस्थिती वैयक्तिक तसेच शैक्षणिक जीवनात वेगवेगळे परिणाम निर्माण करते. व्यक्तिपरत्वे तणावाचे परिणाम व प्रतिक्रिया बदलतात. थोडासा दबाव, नैराश्य ही तणावाची कारण ठरतात. यासाठी योग्य वेळी मदत मिळाली नाही तर ताणाची समस्या तीव्र बनते. व्यक्तिची ताण पेलण्याची व सहन करण्याची क्षमता दबली जाते. आणि मग शिक्षकांना अशा परिस्थितीत दैनंदिन काम करणे कठीण होऊन जाते. विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांवरही ताण येतो. पण शिक्षकांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या विवंचनेवरील समुपदेश, मार्गदर्शनाचा विचार केला जात नाही त्यामुळे ताणाला कसे सामोरे जायचे हा शिक्षकांसमोर प्रश्नच निर्माण झालेला आहे.
ताणाकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून या तणावाची लक्षणे ओळखायची गरज आहे. जसे की शारीरिक लक्षणामध्ये डोकेदुखी, अंगदुखी, निद्रानाश, आळस व कंप, शुद्ध हरवणे, जंतूसंसर्ग आजारपण, सतत हातपाय हलवणे, रक्तदाब, छातीत धडक, अपचन अजीर्ण, पोटात गोळा येणे ई. तसेच मानसिक लक्षणामध्ये आहारात बदल, व्यसनाधिनता,अस्थिरता, नखे खाणे वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष, भावनिक लक्षणामध्ये नैराश्य, तीव्र संताप वेंधळेपणा चिंता,रडू कोसळणे,चंचलता आजारपणाची भीती लक्षणे जाणवतात.
शिक्षकांवर असणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या कुटुंब, नातेसंबध, संस्था विदयार्थी शिक्षक, मुख्याध्यापक , संस्थाचालक, पालक यांच्यासोबत काम करताना त्यांच्या अपेक्षा यामुळे अनेक ताण तणाव घेतात.
“शिक्षण क्षेत्रातील ताण ही एक जागतिक समस्या बनली आहे.” विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत या ताणाचा अनुभव येतो. हा ताण शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. तसेच त्याच्या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम करते.
शैक्षणिक ताण म्हणजे?
शाळेतील,कार्यालयातील काम अभ्यास दबावामुळे निर्माण होणारा ताण यामध्ये परीक्षा, गृहपाठ, वाढती स्पर्धा,अपेक्षा आणि शैक्षणिक काम यांचा समावेश होतो. ताणाचे परिणाम – शैक्षणिक कामगिरी स्मरणशक्तीचा -हास नैराश्य, चिंता तणाव इत्यादी तसेच शाळेत खराब प्रदर्शन, कामात दुर्लक्ष,थकवा,डोके दुखी, निद्रानाश
तणावरहित शिक्षणासाठी ताण येण्याची कारणे प्रथम शोधणे ताण घेणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करणे, अभ्यासाचे नियोजन करणे, महत्वाच्या कामाला प्राधान्य देणे, योग्य वेळी पुरेशी विश्रांती घेणे.
स्वतःवर विश्वास ठेवणे आणि नकारात्मक विचारांना दूर करणे ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे.
मित्र व कुंटुबासोबत वेळ घालवणे गरज वाटल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घेणे.
दररोज व्यायाम करने, योगासने करणे, विविध छंद जोपासने सकारात्मक विचारसरणी जोपासणे कामाचे योग्य नियोजन करणे.
शैक्षणिक ताण ही एक गंभीर समस्या आहे त्यावर योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघांच्याही ताणाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे तरच शिक्षण ही एक आनंददायी व तणावमुक्त अनुभव ठरेल.
जगातील ज्ञानात प्रचंड प्रमाणात क्षणाक्षणाने वाढ होत आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी औपचारिक व अनौपचारिक शिक्षण यांची कौशल्ये आत्मसात करणेस वेळ लागतो म्हणून आपली कुवत, क्षमता, बलस्थाने याविषयी पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी सजग राहिले पाहिजे. जीवनशैलीचा प्रभाव न टाकता ती सहज स्विकारावी स्वतःमध्ये बदल करावेत. घडणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगाकडे सकारात्मकतेने बदल करावेत. प्रार्थना, ध्यान, वाचन, भटकंती, संगीत, निसर्गभेटी संग्रह या सारख्या छंदातून ताण तणाव कमी करता येईल.
ताणतणाव विरहित जीवन जगा आणि इतरांना आपल्यासोबत घेऊन चला. वर्गा-वर्गात घडणारे भविष्य तणावमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहूया.