कराड:-कराडातील विविध नागरी प्रश्नांसाठी ‘आदिशक्ती’च्या अश्विनी वेताळ यांचे उपोषण.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-कराडातील विविध नागरी प्रश्नांसाठी ‘आदिशक्ती’च्या अश्विनी वेताळ यांचे उपोषण.

कराड :- कराड शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिशक्ती महासंघाच्या अध्यक्षा अश्विनी वेताळ यांच्या नेतृत्वाखाली कराड येथील प्रशासकीय कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कराड शहर व तालुक्यातील विविध सामाजिक तसेच महिलांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, निवेदने देऊनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने अखेर उपोषणाचे पाऊल उचलण्यात आल्याचे अश्विनी वेताळ यांनी सांगितले.
दरम्यान, तहसीलदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अश्विनी वेताळ व आंदोलकांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. मात्र, केवळ चर्चेवर समाधान न मानता प्रत्यक्ष कार्यवाही होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका अश्विनीताईंनी मांडली.
“आम्हाला आता चर्चा नको, कारवाई पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नांवर वारंवार चर्चा झाली आहे; निवेदनेही देण्यात आली आहेत. आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात ठोस निर्णय आणि तातडीची कार्यवाही झाली पाहिजे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा अश्विनी वेताळ यांनी प्रशासनाला दिला.
उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनासमोर प्रामुख्याने कराड शहर व तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न तातडीने सोडविणे, शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारणे, सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे, कराड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, तसेच नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय भाजी मंडई, बाजारपेठ, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित स्वच्छता राखणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित देखभाल करणे आदी मागण्याही प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
उपोषणस्थळी आदिशक्ती महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती असून, प्रशासनाकडून या मागण्यांवर कोणती ठोस कार्यवाही केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





