वाई:-!! महाराष्ट्रातील ५२ खुळे “उवाच” !!
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
!! महाराष्ट्रातील ५२ खुळे “उवाच” !!
खंडप्राय अशा भारत देशातील १३५ कोटी सर्वसामान्य जनता स्वातंत्र्यानंतर ज्या लोकशाहीच्या खांद्यावर डोके ठेवून सुरक्षित जीवन जगत आलेली आहे अशा जगातील सर्वात प्रबळ असणाऱ्या लोकशाहीला, संविधानाला, राज्यघटनेला चारही बाजूने साम, दाम, दंड, भेद या नितिचा वापर करून तिला सुरंग लावण्याचे, ती उध्वस्त करण्याचे काम केंद्रातील भाजपप्रणित सरकार गेल्या ९ वर्षापासून अव्ह्यातपणे करत आहे, ज्या राज्यात भाजपा व त्यांच्या विचारांची सरकारे आहेत त्या राज्यात सुद्धा केंद्रातील कुटनीतीचा अवलंब काटेकोरपणे चालू आहे. तमाम भारतीय जनतेला आश्वस्थ करण्यासाठी, लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी,ती जिवंत ठेवण्यासाठी, लोकांच्या मनातले भीतीचे मळभ दूर करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांनी संकल्प केला त्यातून देशातील जनमानस एकत्र करण्याकरता,जोडण्याकता ३५०० हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा काढली ती यशस्वीपणे पूर्ण केली त्यायोगे संपूर्ण देश ढवळून निघाला विद्यमान सरकारची निष्क्रियता, ढोंगीपणा, लबाडी जनतेसमोर आणण्याची संधी विरोधकांना प्राप्त झाली, जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपा सरकारला पोटशूळ उठला आहे . अल्पावधीतच श्री राहुल गांधीचा महाराष्ट्र दौरा होवू घातला आहे, सावरकरांच्या मुद्द्यावरून श्री राहुल गांधींनी माफी मागितल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी वल्गना महाराष्ट्रातील भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केली आहे, प्रदेशाध्यक्षांच्या कोल्हेकुईचे वर्णन म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” या सदरात मोडणारे आहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख देशमुख यांनी दिली.
सावरकरांची छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांच्या बद्दलची मते तपासली तर खरे सावरकरांचे विचार काय होते याची महती पटेल,बरे २०१४ पूर्वी भाजपाच्या दृष्टीने विस्मृतीत असलेल्या सावरकरांचा २०१४ ला सत्ता आल्यानंतरच नेमका पुळका आलेला आहे हे उघड सत्य आहे. श्री राहुल गांधींना अटकाव करण्यासाठी त्यांच्यावर २ वर्षांपूर्वी कर्नाटक मधील एका जाहीर सभेतील एका वक्तव्यावरून खोटी केस दाखल करून ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा कांगावा भाजपाने केला व त्या आधारे खोटी केस दाखल केली, सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या गुजरात राज्यातील न्यायसंस्थेने तातडीने त्यांना शिक्षा सुनावली व केंद्र सरकारने तत्परतेने त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द केले व त्यांचे राहते घरही काढून घेतले, अदानींच्या शेल कंपनीत २०००० कोटी रुपये कुठून आले हा प्रश्न श्री राहुल गांधींनी संसदेमध्ये उपस्थित केला आणी तेच खरे भारतीय जनता पार्टीच्या त्रागाचे मूळ आहे. एका बाजूला श्री राहुल गांधींना हा न्याय तर दुसरीकडे हीमांता बिसवा, भावना गवळी, बोमई, येडुरप्पा अशा अनेक बीजेपी नेत्यांच्या चौकशी विस्मृतीत गेल्या, राफेल पेगॅसेस, हिंडनबर्ग रिपोर्ट, चायना ऑपरेशनबाबत केंद्रसरकार मूग गिळून गप्प आहे,अग्निपथ योजना काढून तरुणाईला पंगू करण्याचा घाट घातला,२०१४ साली असणारे ५५ लाख कोटींचे कर्ज ८ वर्षात १५६ लाख कोटी रुपयांवर कसे काय गेले हा भारतातील बुद्धिजीवींना पडलेला प्रश्न आहे, रू. ८५०० कोटी किंमत असणारी दोन अत्याधुनिक विमाने मा. पंतप्रधानांच्या दिमतीला आहेत, शोबाजी व मोठमोठाले इव्हेंट हे मा. पंतप्रधानांच्या आवडीचे विषय आहेत, पंजाब मधील शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी मृत्युमुखी पडले तर मा. पंतप्रधान म्हणतात “मेरे लिए गये क्या” फेब्रुवारी २०१९ आली पुलवामा हत्याकांड झाले तेव्हा आदरणीय मोदी साहेब जिम कार्बेट नॅशनल पार्क मध्ये विदेशी जर्नालिस्ट सोबत शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते, ४ दिवसांपूर्वी मा. पंतप्रधानांचे निकटवर्तीय समजले जाणारे ४ वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल पद भूषवलेले व पुलवामा घटनेवेळी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल राहिलेले श्री सत्यपाल मलिक यांची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी इतक्या गंभीर आहे की त्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. CRPF चे ९०० जवान रस्त्याने जात असताना ३०० किलो आरडीएक्स असणारी गाडी जवानांच्या ताफ्यामध्ये घुसवून तिचा स्फोट घडवण्यात आला, त्यात ४० जवान मृत्यूमुखी पडले, सदरची गाडी १० ते १२ दिवस त्याच भागामध्ये फिरत होती हे विशेष. सीआरपीएफने पाच विमानांची मागणी केली असताना विद्यमान एनडीए सरकार ती सुविधा देऊ शकले नाही की जाणीवपूर्वक दिली गेली नाही हा प्रश्न श्री मलिक यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान व देशाचे राष्ट्रीय सल्लागार दोघांनी श्री मलिक यांना या गोष्टीची वाच्यता करण्यापासून जाणीवपूर्वक रोखले, त्यानंतर काही दिवसांनी “आतंकवादीयोंको घर मे घुसके मारेंगे” म्हणत बालाकोट स्ट्राइक केला गेला व त्याचा खुबीने राजकारणासाठी वापर केला, आपले आदरणीय प्रधानमंत्री कुठल्या मातीचे बनलेले आहेत असा प्रश्न भारतीय जनतेला पडलेला आहे.
काल परवा श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा लाखो लोकांच्या उपस्थितीत भर उन्हात पार पडला, त्यमध्ये १३ लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला अनेक जण घायाळ झाले, हा सोहळा श्री धर्माधिकारी यांच्यासाठी होता का देशाचे गृहमंत्री आ. अमित शहांसाठी इव्हेंट होता अशी शंका येण्यास वाव आहे, थोडे थोडके नव्हे तर तब्बल १४ कोटी रुपये खर्च करून सोहळा पार पाडण्यात आला, इतकी भयंकर घटना घडूनही त्यावर ना चौकशी समिती, ना कुणावर कारवाई, ना कोणता खुलासा.सदर घटनेची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वीकारण्याऐवजी श्री धर्माधिकारी यांच्या माथी फोडण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे, सलग ५ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब “काडतूस हूं, झूकेगा नहीं मै घूसेगा” असे कार्टून फिल्म मधील मोगली सारखे जाहीर डायलॉग मारतात तेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीविषयी आदर वाटण्याऐवजी त्यांच्या वर्तनाची कीव येते, ४ दिवसांपूर्वी नागपूर येथे दर्शन कॉलनी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा संपन्न झाली सभे करता मोठ्या प्रमाणात SC, ST, OBC, मुस्लिम, मराठा इत्यादी जाती धर्मांची लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते या लोकांच्या उपस्थितीमुळे दर्शन कॉलनी मैदान अपवित्र झाल्याचे कारण सांगून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ते मैदान गोमूत्र व गंगाजल शिंपडून साफ केले यावरून भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये इतर धर्माच्या लोकांबद्दल किती आकस आहे व बीजेपी विचारसरणीचे लोक किती धर्मांध आहेत हेच त्यांच्या कृतीतून दिसून येते बीजेपी कार्यकर्त्यांच्या या विकृत मानसिकतेला श्री नितीन गडकरी श्री देवेंद्र फडणवीस व श्री बावनकुळे यांची मुकसंमती असल्याचेच प्रतीत होते सध्या देशातील व महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे वर्तन बघून ज्या मतदारांनी त्यांना सत्तेत बसवले ते उद्वेगाणे म्हणत असतील “हेचि फळ काय मम तपाला” असे श्री कल्याण पिसाळ देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ-देशमुख, ओझर्डे
उपाध्यक्ष-वाई तालुका काँग्रेस कमिटी.
फोन- ९८५०४१२९०९